Monday, December 10, 2012

आंबा आणि आजोबा भाग - १

माझ्या बाबांनी लिहिलेली हि एक गोष्ट...

 आंबा आणि आजोबा भाग - १


विजया दशमीसाठी आजोबा कोकणातल्या गावी जाण्यास निघाले होते. कोकणची लाल माती त्यांना खुणावत होती. समुद्राच्या भरती-ओहोटींच्या लाटा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या. नोकरी व्यवसायात पुर्णपणे झोकून दिल्यावर आठवणींचा एक कप्पा बंद झाला होता. आपण किती वर्षांपूर्वी को़कणातल्या गावी गेलो होतो ते आठवणे आजोबांना थोडेसे जड झाले होते!

मुलांनी ड्रायव्हर आणि गाडीची सोय केली होती. पण ऐकतील ते आजोबा कसले! एकटयाने प्रवास करायचा होता. नेहमीची लाल टपाची एस्.टी. बस आता 'परिवर्तन' झाली होती म्हणे! रातराणीचा २ बाय २ चा प्रवास अनुभवायचा होता. शिवाय जेष्ठ-नागरीकांचा सवलीताचा आनंद लुटायचा होता. मनासारखा चार-चौघांसारखा प्रवास करायचा होता. बरेच दिवसांनी एकटेपणाची मुशाफिरी करायची होती. 'अरे माझी काळजी करू नका' आजोबांनी मुलांची समजूत काढून त्यांना "बाय बाय" केला! बसमध्ये अगदी 'विंडो सीट' मिळाली होती. खिडकीवर मान टेकवून गार हवेचा आनंद आजोबा घेत होते!

बघता बघता बस शहराच्या बाहेरपडून गोवा महामर्गावर आली. पनवेल-पेण-मानगाव वरून बस धूराळा उडवीत कोकणातल्या लाल मातीच्या रस्त्याला लागली होती. अजूनही रस्ता तसा अरूंदच होता पण सडक आता पक्की झाली होती. रात्री कोकणातल्या गावांत तशीच निरव शांतता होती. दिव्याची सोय असल्याने गाव आल्याचे समजत होते. रस्त्यावर एकेरी वाहतूक वाहक-चालक ह्यांना परिचयाची होती. बघता बघता बस डोंगर माथ्यावर आली. घाट ओलांडला की दोन-अडिच तासांत आजोबांचे गाव येणार होते! थोड्याच वेळात कोकणातल्या वाड्या-वस्त्यांत शिरून बस मुक्कामाला पोहोचणार होती. एका अनामिक ओढीने आजोबा प्रवासाचा आनंद घेत होते.

गाडी सुसाटतच होती. वेगाची नशा जरा जास्तच वाटत होती. आजोबांना या नशेची देखिल भीति वाटू लागली. सहप्रवासी देखिल जागे झाले होते. नकळत सा-यांचे हात आपापल्या कुलदैवताला जोडले गेले होते!
ड्रायव्हर-कंडक्टर यांनी आपला अनुभव पणाला लावला होता. कंडक्टर प्रवाशांना धीर देत होता. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलाच! एका वळणावर बस कशीतरी खड्डा आणि भिंत ह्यांत अडकून थांबली. 'गियर बॉक्स' जाम झाली! ड्रायव्हरने एका दमात सांगून टाकले! अपघाताची तीव्रता आणि प्रवाशांचे दडपण कमी केले. सारे प्रवासी स्वत:ला आणि इतरांना धीर देत बस मधून उतरले.

स्वतःच्या जीवापेक्षा काही प्रिय नसते ते अशा प्रसंगी  उमगते! झोळी खांद्याला लटकवून ओजाबा खाली उतरले! ड्रायव्हर-कंडक्टरचे आभार मानले!

सर्वत्र अंधार होता. आकाशात तारे आणि जमिनीवर दूरवरचे वाड्यां-वस्त्यांतील दिवे लुकलुकत होते. मोबाईलच्या प्रकाशात स्वत:ला आणि सहप्रवाशाला सारे न्याहाळत होते. जीव वाचला ह्या नादात किरकोळ खरचटणे सारेजण विसरले होते. मोबाईलवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न चालू होते, रेंजा थोडा अडथळा होताच. ब-याच वेळाने दोन दिवे लुकलुकत येऊन थांबले. परिवर्तन बस बघून सा-यांना आनंद वाटला. ड्रायव्हर कंडक्टरची चर्चा सुरू झाली. तंबाखूचा बार भरला गेला. घाई-घाईने जमतील तेवढे प्रवासी आणि अपघाताची बातमी घेऊन परिवर्तन बस निघून गेली! आजोबा, सहप्रवासी ड्रायव्हर-कंडक्टरसह रस्त्याच्या कडेला शिळोप्याच्या गप्पा करत बसले! रातकिड्यांचे संगीत चालू होते. काजव्यांचा प्रकाश आजोबा खूप दिवसांनी परत अनुभवत होता. हाच प्रकाश सा-यांना आधार देत होता!

गप्पांच्या ओघांत नकळतच उमगले कि आता फटफटले होते! रातकिड्यांचे संगित भैरवीतून प्रसवू लागले. काजव्यांनी त्या ज्योतिर्मयाला मुजरा घातला आणि त्याचा निरोप मागितला! रस्ता आणि आजूबाजूचा परिसर थोडा स्पष्ट झाल्यावर आजोबांनी झोळी उचलली आणि सा-यांचे आभार मानले आणि गावाच्या दिशेने चालावयला सुरूवात केली. दिड-दोन किलोमीटर्सवर आजोबा एका वाडीवर पोचले, जाग दिसत होती. आजचा मॉर्निंग वॉक भन्नाटच होता! वाडीपाशी पोचल्यावर आजोबांनी खास कोकणी शैलीत साद घातली, तसाच प्रतिसाद आला आणि लगोलग एक माणूस देखिल आला! "बसा आजोबा - पाणी घ्या!" गण्याने पितळी तांब्या-भांडे आजोबांच्या हाती ठेवता ठेवता अलगद आजोबांच्या झोळिचा भार आपल्याकडे घेतला! खूप दिवसांनी गार गार पाण्याने आजोबांनी मुखप्रक्षालन केले! ते थंडगार पाणी पोटात साठवले. चेह-याला थंड पाण्याने स्वच्छ केले! हुशारी आली त्यांना!

इकडे कशी वाट धरली आजोबा? गण्याने विचारले, आजोबांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि सारा प्रसंग गण्याला थोडक्यात सांगितला. आतून आलेला चहा गण्याने आजोबांना दिला, आणि म्हटले 'आजोबा... चहा घ्या नि मग गरम गरम पाण्याने स्नान करून घ्या! दुपारचे इथेच जेवून घ्या न् मग बघू पुढच्या प्रवासाचे!' गण्याचा आग्रह आजोबांना मोडवला नाही. मस्त गरमागरम पोह्यांचा नाष्टा करून आजोबांनी मुलांना संपर्क केला आणि गण्याकडे सुखरूप असल्याचे वर्तमान कळविले.
आजोबा ओसरीवर जरासे पहूडले. समोरच्या शाळेत मुले येऊ लागली. शाळा मास्तर आल्याची घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली आणि अलवार झालेले आजोबांचे मन आठवणींच्या माध्यमातून शाळेत जाऊन बसले. शाळेतील आठवणींचा पट उलगडत होता. आजोबा कविता म्हणू लागले -

चिमी-चिंगी शाळेत आली,
गोट्या-छोट्या अन् बंड्यादेखिल आली
उंदिरमामावर बसून गणपती आले
श्रीगणेशा अभ्यासाचा करून गेले
हातावर मोदक ठेवून गेले
मोरावर बसून सरस्वती आली,
ग, म, भ, न शिकवून गेली
बुध्दीची खिरापत वाटून गेली!
सिंहावर बसून दुर्गा आली
ज्युडो, कराटे शिकवून गेली!
हत्तीवर बसून लक्ष्मी आली
सोन्या-चांदिची महती वदली!
पेढे-बर्फी वाटून गेली!
बघता बघता शाळा सुटली...
चिंगी-चिमी घरा गेली!

शाळेच्या आठवणीत रमलेले आजोबा, बालपणच्या रम्यकाळाच्या झुल्यावर अनवटपणे झुलत होते! वर्गाची ती कौलारू खोली, पावसाळ्यात टप-टप गळणारे पाणी.. ते चुकवत शिकवणा-या मास्तरांची कसरत, चिखलाने भरलेले हात - पाय, डोक्यावरची पांढरी टोपी अन् घसरणारी चड्डी सांभाळत दंगा करण्याची ती अवीट गोडी.. या सा-या आठवणी त्यांच्या मनात रुंजी घालत होत्या!

क्रमशः
यशवंत डबीर

No comments:

Post a Comment